Monday 11 July 2011

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जेष्ठ समाजसेविका आणि बाबा आमटे यांच्या सहचारिणी साधनाताई आमटे यांच शुक्रवारी आनंदवन येथे निधन झाल. निधनासमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. आनंदवनातील बाबा आमटे यांच्या "श्रद्धावन" या समाधीस्थळावरच रविवारी साधनाताई यांना समाधी देण्यात आली. गेले काही महिने त्यांच्यावर उपचार चालू होते पण या उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्या कोमात गेल्या होत्या.
साधनाताई यांचा जन्म ५ मे १९२६ ला नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री घुले. पुढे बाबा आमटेंशी त्यांच लग्न झाल आणि त्या साधनाताई आमटे झाल्या. बाबा आमटेंच्या समाजसेवेत त्यांनीही स्वत:ला वाहून घेतलं. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारलं. त्यांनी आपले आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेत खर्च केलं. रुढी परंपरेच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला आणि कुष्ठरोग्यांना न्याय मिळवून दिला. साधनाताईंच "समिधा" हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. हे आत्मचरित्र मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. आपण ते जरूर वाचावे. साधनाताईंच्या जीवनापासून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. साधनाताई या सर्व समाजसेवकांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श आहेत. आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाप्रती आपली सामजिक बांधिलकी असते ह्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून जे काही शक्य असेल ते समाजासाठी करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यातील थोडा वेळ मानवी समाजाच्या हितासाठी बाजूला काढला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. 
   

Tuesday 5 July 2011

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का??

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का?? खून करा मग. कोणाचाही खून करा आणि कोणताही motive ठेवू नका. जेणेकरून तुम्ही लवकर सुटाल. थोडीफार शिक्षा होईल पण घाबरू नका खऱ्याच खोट करणारे वकील आहेतच ना? तूम्हाला थोडीफार सजा होईल पण बाहेर पडलात की फायदेच फायदे तुम्हाला काही अक्कल नसली तरी मिडीया तुम्हाला एवढी प्रसिद्धी देईल कि तुम्हालाच वाटू लागेल की तुम्ही नक्कीच काहीतरी देशभक्तीच चांगल काम केलय. तुम्ही कुठे शिकलात, तुमच बालपण कस गेल, तुम्ही कुठे नोकरी करायचा वगैरे वगैरे सर्व दाखवेल मिडीया. नंतर एखादी पत्रकार परिषद घ्या आणि त्यात न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा तुम्ही कसा केला नाही हे पण रडून रडून सांगा. मिडिया इतर महत्वाचे सर्व प्रश्न बाजूला ठेवून Live प्रक्षेपण करेल. त्यानंतर रामगोपाल वर्मा आहेतच. मला अभिनय येतो असे सांगितलात तर मुख्य भूमिका पण मिळेल. आणि एक तुम्ही ज्याचा खून केलाय तोच कसा वाईट होता हे सांगायला मात्र विसरू नका. भरपूर फायदे आहेत ना खुनाचे तुम्हाला काय वाटत???

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 

गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 

२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    

८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   


ShareThis

Registered With