
अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही. काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.