Sunday 22 June 2008

आण्विक सहकार्य गरजेचे

आण्विक सहकार्य गरजेचे

संयुक्त अमेरीकन राष्ट्रा बरोबर होणाऱ्या अणुकरारामुळे भारतीय संघराज्याला फायदाच होणार आहे. या करारानंतर भारतात नवीन अणुभट्टया उभ्या राहतील. अणुउर्जा निर्मितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होईल. भारत उर्जा निर्मितीत सक्षम होईल. भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध मजबूत होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अणुकरारामुळे भारत नव्याने उदयास येत असलेल्या चिनी महाशक्तीशी सामना करु शकेल.

या कराराला होणारा विरोध अनाकलनिय आहे. केवळ विरोधासाठी विरोध देशाच्या हितास घातक ठरेल. काही लोकांचा विरोध हा केवळ हा करार अमेरिकेबरोबर होत आहे म्हणून आहे. गंमत म्हणजे शेजारी राष्ट्र चीनने यापुर्वीच असाच एक करार अमेरिकेसोबत केला आहे. त्या कराराला त्यांच्या देशात कोणताच विरोध झाला नव्हता.

करारासंबंधित प्रश्नांवर गेल्या जुलै महिन्यात भारत-अमेरिका व्दिपक्षीय चर्चा झाली होती. या चर्चेनंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. नागरी अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा प्राधिकरणाच्या (आयएईए) निरीक्षणाखाली असतानाही इंधनावर फेरप्रक्रिया करण्याची मुभा भारताला देण्यात आली आहे. समजा भारताने आण्विक चाचणी घेतलीच तरी अणुकरार संपुष्टात आणण्याऐवजी द्विपक्षीय चर्चा करण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजेच भारत आत्मसंरक्षणाचे कारण देवून अणुचाचणी करु शकतो आणि या अणुचाचणीनंतर अमेरिका चर्चेस बंधनकारक राहील.

प्रश्न आहे स्व्यंपूर्णतेचा तर ते शक्य वाटत नाही त्याला प्रमुख कारण म्हणजे थेरीयम असो वा युरेनियम दोन्ही बाबतीत आपण आयातीवर अव्लंबून राहणार आहोत.अणुकरार न झाल्यास भारताला युरेनियम आयात करणे शक्‍य होणार नाही. नियोजन आयोगाचे सदस्य किरीट पारिख यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार भारताला २०३० पर्यंत दोन अब्ज टन कच्चे तेल आणि दहा लाख मेगावॉट विजेची आवश्‍यकता भासेल. अणुकरार न झाल्यास २०३० पर्यंत फक्त ४८ हजार मेगावॉट वीजच निर्माण करता येईल.

आपल्या या अणुकराराला रशियानेही पाठींबा दिला आहे. रशियाच्या मते हा अणुकरार भारतासाठी उपयुक्त असून करारानंतर रशिया अधिक उघडपणे भारताची मदत करु शकेल. रशिया आंतरराष्ट्रीय नियमांनी बांधला गेला आहे जर हा करार झाला तर भारताला मदत पुरवणे सोपे होईल.

असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी तर हा करार करत नाही ना? जगातला कोणताही देश फायद्याशिवाय करार करत नाही. या करारात जसा भारताचा फायदा आहे तसा अमेरिकेचाही फायदा आहे. पहिला फायद म्हणजे या करारानंतर ज्या अणुभट्टया उभ्या राहतील त्याची कंत्राट अमेरिकन कंपन्यांना मिळतील. दुसरा फायदा असा की नव्याने महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या चीनवर भारताच्या मदतीने अंकुश ठेवणे सोपे होईल. हा करार होणे आपल्या शत्रु राष्ट्रांना अजिबात आवडणार नाही. त्यामुळे हा करार लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी देशांतर्गत विरोध मिटवणे गरजेचे आहे.

फिडेल कॅस्ट्रोची निवृत्ती

क्युबा कॉम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांनी आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तत्पुर्वी जुलै २००६ मध्ये त्यांनी राज्यकारभार तात्पुरता भावाकडे सोपवला होता. परंतु आज बी.बी.सी. च्या बातमी नुसार ते कायमचे पाय उतार झाले.


प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना हा निर्णय घेणे भाग पडले. एक सामर्थ्यशाली नेता अशी त्यांची ओळख आहे. १९५९ च्या क्युबन कॉम्युनिस्ट क्रांती पासून त्यांचा क्युबावर एकछत्री अंमल राहीला हे विशेष. गेले १८ महिने ते राज्यकाराभारापासून दुर होते.

Saturday 21 June 2008

राजकारण

राजकारणाला अनेक रंग आहेत, अनेक रुपे आहेत. राजकारण हे काही सामान्य माणसाचे काम नाही. आपल्या भारतात तर राजकारणाला मोठी पंरंपरा आहे. महाभारत असो किंवा चाणाक्यनिती राजकारण सर्वत्र आहे. राजकारण बुध्दीबळाच्या पटासारखे असते. विरोधकाचे नामोहरण करण्यासाठी आपलीच प्यादी वापरली जातात. हे राजकारणी फार कसलेले खेळाडू असतात. कोणत्यावेळी कोणती चाल खेळायची आणि डाव कसा उलटवायचा हे ह्यांनाच माहिती. जेवढा व्यक्ती हुशार तेवढा त्याचा खेळ परफेक्ट. विरोधी प्यादीला बरोबर कोंडीत पकडून त्याची स्वप्ने उधळली जातात.

अशाच चाली सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खेळल्या जात आहेत. या चालींनी कदाचीत शक्तीशाली विरोधक आणि मुख्य स्पर्धक कमजोर होइल पण त्याचबरोबर पक्ष कमजोर होइल आणि त्याचा थेट फायदा इतर पक्षांना होइल.

Thursday 19 June 2008

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद

गेल्या आठवडयात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळया घटनात पत्रकारांवर हल्ले झाले. केतकरांच्या घरावरील हल्ला, सामना कार्यालयांची तोडफोड, सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला काळे फासणे ह्या सगळ्या निषेधार्ह घटना आहेत. लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील हे हल्ले हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवितात. कोणत्याही विचारांना उत्तर हे विचारांनी देता येते. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार काही लोकांना पहावत नाही. कोणत्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी हिंसा करुन काय मिळणार आहे? काहीवेळा तर आंदोलनातील हिंसेमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यावेळी या आंदोलकांचा राष्ट्रवाद कोठे जातो कोण जाणे? स्वतःच्या हातांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करताना यांना काहीच वाटत नाही का?

आपल्यातला राष्ट्रवाद संपत चालला आहे असे मला वाटते. याची कारणे अनेक आहेत. भ्रष्टाचार हे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार आणि पैशाची भूक ही आपल्या व्यवस्थेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ह्या पैशाच्या भूकेमुळे अनेक देशद्रोही तयार होतात. दहशतवादी येथे घुसखोरी करतात आणि आपल्या योजना यशस्वी करतात, त्या काय भारतीयांच्या मदतीशिवाय? हे स्वकिय शत्रु कोणत्याही धर्माचे असु शकतात. त्यांचा मतलब फक्त पैशांशी असतो. ज्या भारतात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पैसे मोजावे लागतात त्या भारतात अशा कारवाया करणे सोपेच आहे. शत्रु राष्ट्रांना दोष देवूयाच पण त्याचबरोबर स्वतःच्या दोषांचे काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. भ्रष्टाचारी माणसे आपल्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे देतात. या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलांवर काय संस्कार होणार? माझ्यामते भ्रष्टाचार हा राष्ट्रद्रोहच आहे.

परकियांच्या दहशतवादाबरोबरच आता स्वकियांचाही दहशतवाद सुरु झाला आहे. काही लोक व्देषाचे विष पाजून देशाचा सर्वनाश करत आहेत. स्वतःच्या माणसांचे जीव घेण्यासाठी बॉम्ब तयार करायचे काम सुरु झाले आहे. हे वेळीच थांबवले नाही तर आपल्या देशाची स्थिती जाती, वंश आणि धर्मांच्या युध्दांनी रसातळाला गेलेल्या आफ्रिकन देशांसारखी होइल. भारत एके काळी विश्वगुरु म्हणून गौरवला गेला होता. तीच स्थिती पुन्हा आणायची असेल तर राष्ट्रवाद जागृत करावा लागेल.

काही लोक राष्ट्रवाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतात. हे राष्ट्रवाद वगैरे आपल्याला काही जमणार नाही असे बऱ्याच जणांचे विचार असतात. सर्वसामान्य माणूस काय करु शकतो असेही प्रश्न उठतात. काही सोप्या गोष्टी सांगतो ज्या आपण करु शकतो. प्रथम तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच योग्य वापर करा. आपण मतदानच करत नसाल तर देशाला चांगले नेतृत्त्व कसे मिळेल? स्वतःच्या परीसराची स्वच्छता ठेवा. तुमच्या घरीभाडेकरु ठेवताना त्याची कागदपत्रे तपासून पहा. शेजारीपाजारी काही संशयास्पद वाटल्यास त्याची खबर योग्यत्या अधिकाऱ्यांना द्या. माहितीच्या अधिकाराचा वापर करा.

आपण आपल्या संस्कृतीत देशाला,भूमीला माता मानतो. या मातेची खरी सेवा करायची असेल तर देशाशी प्रामाणिक राहा. तीच खरी देशसेवा होइल.

Thursday 12 June 2008

माझे ब्लॉगींग .....

माझे ब्लॉगींग .....

तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.

या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.

कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.

खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?

प्राजक्ताने आज कोणत्या पाककलेबद्दल लिहीले आहे?

आज मोरपीसमध्ये नविन काय आहे?

आज महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?

यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा, चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.

मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.

जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि रुचिरा यांचे ब्लॉग कधी सोबती बनले कळलेच नाही. चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......

- वामन परुळेकर

Technorati Profile

Monday 2 June 2008

विश्वासाची माती ???

गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग न्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?

राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.

पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.


Monday 21 April 2008

२८०८

वर्ष - २८०८

स्थान - महाराष्ट्र इतिहास वाहिनी (अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त),
महाराष्ट्र

भाषा - मराठी असेलच असे सांगता येत नाही पण कल्पना करुया.

नमस्कार आपले स्वागत इतिहास २४ तासवर . आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या संशोधकांना २००८ सालातील काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन माणसे क्रिकेट या खेळाची खूप शौकिन होती असे दिसते. आमच्या संशोधकांना काही वृत्तपत्रांची कात्रणे आणि चित्रफिती मिळाल्या आहेत. त्याचे संशोधन चालू आहे. २१०७ च्या दरम्यान पुराखाली दबल्या गेलेल्या एका मोठया शहरात उत्खननात हे पुरावे सापडले. तत्कालीन पुराव्यानुसार क्रिकेट या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा भारतदेशी खेळवली जात असे.

सापडलेले पुरावे अर्धवट स्थितीत असल्यामुळे आणि लिपी अवघड असल्यामुळे पूर्ण माहिती मिळालेली नाही. ह्या स्पर्धेचे नाव आय्.पी.एल्. होते. ली नामक एक खेळाडू पंजाब संघाकडून खेळायचा. हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. यावरुन स्पष्ट होते की लींचे मूळ पंजाबात असावे. तत्कालीन भारत देश हा प्रचंड श्रीमंत देश असावा कारण एका खेळाडूला करोडो रुपये मानधन दिले जात होते. काही खेळाडूंची नावे आमच्या हाती लागली आहेत. यात ब्रेट ली, सचिन, राहूल आणि शाहरुख खान नामक खेळाडूंचा समावेश आहे. हा शाहरुख खान एका संघाचा मालक असूनही १२ वा खेळाडू होता. त्याच्याकडे खेळाडूंना पाणी देण्याचे काम असावे.

मिळालेल्या पुराव्यानुसार असे सिध्द होते की तत्कालीन कलाकार हे उरलेल्या वेळेत क्रिकेट खेळायचे. तत्कालीन क्रिकेटचे सर्वेसर्वा पवार हे व्यक्ती होते. त्यांनीच ह्या स्पर्धेची सुरुवात केली.

Thursday 10 April 2008

खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?

खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?

सध्या खासगी वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे. खासगी इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्या २४ तास बातम्या देत आहेत. यातील काही वाहिन्या स्वतःला राष्ट्रीय म्हणवून घेतात. पण ज्या वाहिन्यांवर दिल्ली,यु.पी.,बिहार,मुंबई या मर्यादित क्षेत्रातल्या बातम्या दाखवल्या जातात त्या वाहिन्या राष्ट्रीय कशा? या वाहिन्यांवर इतर राज्यांच्या बातम्यांसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ या राज्यांच्या बातम्या तुलनेत फारच कमी दाखवल्या जातात. काही वाहिन्या तर भारतीय सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमा असेच समजून चालतात. कन्नड,तमिळ,तेलगू चित्रपट उद्योग फार मोठा उद्योग आहे. या चित्रपटांच्या बातम्यांना या वाहिन्या फारसे महत्त्व देत नाहीत.

मला असे वाटते की जोपर्यंत या वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणता येणार नाही. या सर्व खासगी राष्ट्रीय वाहिन्यांनी डी.डी.न्यूज या सरकारी राष्ट्रीय वाहिनीकडून आदर्श घ्यावा. डी.डी.न्यूजवर प्रत्येक राज्याच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. स्टेट स्कॅन आणि सीटी स्कॅन न्यूजमध्ये प्रत्येक क्षेत्राला वेळ वाटून दिलेला असतो, त्यावेळेत त्या त्या क्षेत्राच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. खासगी वाहिन्यांनीही प्रत्येक क्षेत्राला ठरावीक हक्काची वेळ उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय वाहिन्या ठरतील.

Saturday 5 April 2008

नववर्षाच्या शुभेच्छा

नववर्षाच्या शुभेच्छा

सर्व ब्लॉग वाचक आणि चालकांना नववर्षाच्या शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

Wednesday 26 March 2008

आत्महत्या चालूच

आत्महत्या चालूच

अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.

सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.

गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.

"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."

- वामन परुळेकर

Saturday 15 March 2008

नेपाळची एवरेस्ट बंदी



बी.बी.सी. कडून मिळालेल्या माहितीनुसार चीनमधिल ऑलंपिक आयोजनात कोणताही व्यक्तय  येउ नये म्हणून नेपाळने बेस कॅंपच्या पुढील प्रदेशात मे महिन्यापर्यंत प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. चीनने यापूर्विच नेपाळकडे तशी मागणी केली होती. चीनला ऑलींपिक ज्योत एव्हरेस्टवर न्यायची आहे आणि तिबेटी लोकांचा त्याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. हा विरोध टाळण्यासाठी चीनने बंदीची मागणी केली होती. तिबेटी लोक गेली अनेक वर्षे स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत, पण चीन तिबेटला स्वतःची मालमत्ता समजते. तिबेटच्या आंदोलनाचा त्रास होउ नये याची काळजी चीन घेत आहे.

Tuesday 26 February 2008

देशप्रेमी लियांडर पेस

तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. खेळताना तो देशासाठी खेळतोय याचा प्रत्यय त्याचा प्रत्येक सामना बघितल्यानंतर येतोच. असा आपला टेनिसपटू लियांडर पेस नेहमीच देशप्रेमाने भारावून गेलेला असतो.

ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.

खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.

डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतीय व्यक्तीस माझा सलाम.

आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है ।

-वामन परुळेकर

Friday 15 February 2008

मराठी नगरी ?

मराठी नगरी ?

"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"

"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.


हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.


पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.



आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का?


मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद


- वामन परुळेकर

Tuesday 12 February 2008

तिर्थक्षेत्र गणपतीपुळे,महाराष्ट्र

गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिरासमोरील प्रवेशव्दाराजवळचा हत्तीचा पुर्णाकृती पुतळा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.


Monday 11 February 2008

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?
आत्ता बी.बी.सी. वर बातमी बघितली. शांततेसाठीच नोबेल पारीतोषीक विजेते इस्ट तिमोरचे राष्ट्रपती जोस रामोस होर्ता यांच्या वर आज खुनी हल्ला झाला. बंडखोरांनी त्यांच्या पोटात गोळ्या झाडल्या. आता त्यांची प्रकृती स्थीर आहे.

याच जोस रामोस होर्ता यांना १९९६ सालचे नोबेल पारीतोषिक प्रदान करण्यात आले होते. ते शांततेचे पुरस्कर्ते आहेत. ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले होते.

२००२ साली या छोटया देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली होती.

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

मग या सेटिंग्ज करुन पहा.

1) स्टार्ट बटण दाबुन कंट्रोल पॅनलला जा.
2) तुम्ही जर Category View वर असाल तर "Date, Time, Language and Regional Options" हा आयकॉन सिलेक्ट करा आणि त्यानंतर "Regional and Language Options" हे सिलेक्ट करा.
3) आता "Regional and Language Options" सिलेक्ट करा.
४) आता Languages टॅब सिलेक्ट करा आणि खात्रि करुन घ्या की तुम्ही "Install files for complex script and right-to-left languages" हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. एक सुचना बॉक्स येइल येस वर क्लिक करा.
५) एक्स्पी ची सिडी लागेल काही फाईल्ससाठी ती इन्सर्ट करा.

हे सर्व यशस्वी करा ... आणि मराठी वापरा..

Friday 1 February 2008

दुसरा सुर्य


काल इंडिया टी.व्ही. वर बातमी बघितली की शास्त्रज्ञांना म्हणे दुसऱ्या सुर्याचा शोध लागलाय. हा दुसरा सुर्य आपल्या पृथ्वीपासुन आपला सुर्य जेवढया अंतरावर आहे त्याच्या दुप्पट अंतरावर आहे. मात्र दुर असला तरी त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहचू शकेल. मुळात हा दुसरा सुर्य म्हणजे एक धुमकेतु आहे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे.

चॅनेलवाल्यांचे असे म्हणणे आहे की हा आकार जर असाच वाढत गेला तर आपल्या पृथ्वीला दुसरा सुर्य मिळेल. त्यांचे असेही म्हणणे आहे की जर हा सुर्य कार्यान्वित झालाच तर आपल्याला चंद्राचे दर्शनच होणार नाही. पर्यायाने काळोखच होणार नाही. मला हे जरा अतिशयोक्ती वाटतय कारण कशावरुन हा दुसरा सुर्य पहिला सुर्य मावळल्यानंतर कार्यान्वित होईल ? याबद्दल आपले मत काय?

Thursday 31 January 2008

मराठी भाषा संकटात?

आज सकाळी एका ब्लॉगवर वाचले की आपली मराठी भाषा आता संपत चालली आहे. रोज वर्तमानपत्रातही अशाचबातम्या छापून येतात. कधी कुठल्यातरी शहरात विचारवंत एकत्र बसून मराठीवर विचारमंथन करतात. रोज हेअसच चालु आहे. खरच मराठी संपणार आहे का? मला विचाराल तर मुळीच नाही. नकारार्थी विचार करत बसुनचालणार नाही. आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवल तर मराठी कशी संपेल ?आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो , पण आपण किती मराठी बोलतो? किती मराठी भाषिक चित्रपट, मालिका पहातो? किती मराठी पुस्तके वाचतो ? सुरुवात आपल्यापासुनच केली पाहिजे.

आणखी महत्त्वाच म्हणजे आपल्याला महिती असेलच की इंग्रजी एवढी लोकप्रिय का आहे ? कारण ती सर्वसमावेषक भाषा आहे. मी कुठतरी वाचल आहे की त्या भाषेत ७०% ईतर भाषेतील शब्द आहेत. आपल्यालाही मराठी भाषा व्यापक करावी लागेल. याच्यावर तज्ञांनी जरुर विचार करावा.

माझी शिर्डी यात्रा

बरेच दिवस आईच्या मनात होते कि शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाउन यावे. पण योगच नव्हता. अखेर आम्ही २९ डिसेंबरला जायच ठरवल. मी आणि माझी बायको विस्मयी २४ला गावात(वेंगुर्ल्याला) पोहचलो.

दिनांक २९ उजाडला, आम्ही पहाटे पाचला उठलो कारण सकाळी ७ची वेंगुर्ला-अक्कलकोट गाडी गाठायची होती. अखेर वेंगुर्ला-अक्कलकोट जलद बस मिळाली. कोल्हापूरला उतरुन बस बदलायची होती. वेंगुर्ला-कुडाळ २० किमीच अंतर पार करत गाडी आता मुंबई-गोवा महामार्गावरुन धावत होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजुचा परीसर निसर्गरम्य. मन प्रसन्न होउन जाते. हिरवीगार वृक्षवल्ली, हिरवगार शेत आणि अधुन मधुन दिसणाऱ्या छोटया छोटया नद्या. सार काही अवर्णनीय.

कणकवलीच्या पुढे घाट रस्ता सुरु झाला. हा गगनबावडा घाट सह्याद्रीतून जाणारा धोकादायक घाट समजला जातो.अरुंद वळणावळणाचा रस्ता भितीदायक वाटत होता. खिडकीतुन सह्याद्रीची विविध रुप दिसत होती. हातातल्या कॅमेराने मी ती दृश्ये टिपत होतो. विलोभनिय उंच कडे, खोल दरी, मागे लहान होत चाललेला रस्ता. अगदी घाट संपता संपता दुर उंचावर गगनगिरीवर महाराजांचा मठ दिसतो. घाट संपल्यावर बस चहासाठी गगनबावडा बसस्थानकावर दहा मिनीटे थांबली. बस स्थानकावर एक छोटस हॉटेल होत, मस्त वडा-पाव चा वास येत होता, माझ्या तोंडाला पाणी सुटल. तीन वडा- पाव पार्सल घेतले गाडीत खायला.बसस्थानकावर मी शिरा खाल्ला. चविष्ट शिरा. उत्तम.. वडे पण बेस्ट होते. कोल्हापुरी मोठे वडे चविला पण चांगले असतात.

आता बस कोल्हापुरच्या मार्गाला लागली. हा रस्ता फारच खराब होता. उसाच्या वाहतुकीमुळे असेल, बस सारखी हलत होती. कोल्हापुर जिल्ह्यातील छोटी-मोठी गावे पाहत होतो. उस आणि साखर कारखाने या दोनच गोष्टी दिसत होत्या. सहकार या भागात बराच रुजलेला. येथील लोकही कष्टाळु आहेत. तसे कोल्हापूरला मी खुपदा गेलोय. कोल्हापुर म्हटल की आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ,लाल रस्सा,कोल्हापुरी रंकाळावरची भेळ आणि सगळयात लोकप्रिय कोल्हापुरी चप्पल , आजकाल फार कमी लोकांच्या पायात दिसते आणि फार कमी लोग जे चप्पल घालतात त्यांना अडवल जातय(मराठी कलाकारांबरोबर घडलेला प्रकार).

अचानक आमची बस थांबली. समोर उसांनी भरलेली बैलगाडयांची रांग रस्ता ओलांडत होती. ह्या बैलगाडया कोल्हापुरच वैशिष्ट. आमच्या कोकणातुन बैलगाडया जवळजवळ हद्दपार झाल्यात पण येथे अजुन टिकून आहेत. या बैलगाडया पार झाल्यावर पुढे एका गावात जनावरांचा बाजार भरला होता. अगदी रस्ताजवळ हा बाजार भरला होता. त्यामुळे गाडी एकदम हळु चालत होती. गायी,बैल,म्हैशी,रेडा असे सगळे शेतकऱ्यांच्या उपयोगातले प्राणी बाजारात उपलब्ध होते. हे सगळ बघुन मला जुन्या मराठी चित्रपटातील दृश्य आठवली. पण बैलाचा आणि माझा ३६ आकडा मला अजिबात लाज वाटत नाही हे सांगायला की मी बैलाला घाबरतो. त्याचे झाले असे , लहानपणी एकदा रस्त्यावरुन जाणाऱ्या बैलाची शेपटी पकडण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी त्या रागीट बैलाने जोरात शेपटी माझ्या तोंडावर मारली आणि मी लोटांगण घातले. त्यावेळी बरच खरचटल होत. तेव्हापासून बैल दिसला की चार हात लांबुनच जातो.

क्रमशः

Thursday 24 January 2008

मच्छिंद्र कांबळी

फोटो : दीपक गायकवाड
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध नाट्यनिर्माते, मालवणी कोकणी भाषा सातासमुद्रापार पोचविणारे मच्छिंद्रकांबळी वय ५८ यांचे गेल्या वर्षी दि. ३०/०९/२००७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसाखऱ्या अर्थाने उमटला तो, "वस्त्रहरण'मधील तात्या सरपंच या भूमिकेने. "वस्त्रहरण' या नाटकाचे ४८९९ प्रयोग झाले.
त्यानंतर पांडगो इलो रे , घास रे रामा , वय वर्ष पंचावन्न , भैय्या हातपाय पसरी , येवा कोकण आपलाच असा , माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.
मच्छिंद्र कांबळींच नाटक वस्त्रहरण मी पहिल्यांदा तळवडेत पाहिले आणि मी बाबुजींचा फॅन झालो. जिवंतअभिनय आणि योग्य टायमिंग हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे. मच्छिंद्र कांबळी खासदार पदासाठी निवडणुकीला उभे होते त्यावेळी प्रचारासाठी त्यांनी तळवडेला धावती भेट दिली होती आणि खास मालवणीतुन भाषण केले होते. ते भाषणही माझ्या स्मरणात आहे.

Sunday 20 January 2008

ओजस्वी मानवतावादी विचार

सर्वांवर प्रेम करा ही माझी शिकवण आहे. आणि ती 'परमात्मा सर्वव्यापक असून सर्वत्र समभावे विद्यमान आहे' या वेदान्तातील सत्यावर आधारलेली आहे.

- स्वामी विवेकानंद (कुंभकोणम व्याख्यान)

देवनागरीत कस लिहाव??

देवनागरीत कस लिहाव??

असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? उत्तर सोप आहे. खाली दीलेल्या संकेतस्थळावर आपण देवनागरीत कस लिहाव ते शिकू शकता..

http://www.classifieds.co.in/hindi.html

अजून काही माध्यमे मराठी लिखाणासाठी...

http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html
http://www.quillpad.com/marathi/
http://www.baraha.com/baraha.htm

ShareThis

Registered With