Friday 30 December 2011

माझे ब्लॉगींग .....आठवणी ........

२००७ मध्ये जेव्हा मी ब्लॉग लिहिण्यास (अर्थातच तोडक मोडक) सुरुवात केली होती त्यावेळी ब्लॉग विश्वात माझे काही मित्र निर्माण झाले होते. आज पाच वर्षांनंतर मी ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी ह्या सर्वांची आठवण येते. खट्टा मिठा सारखा वाचनीय ब्लॉग २०१० लाच थांबला. पी के फडणीस सरांचा महाभारत ब्लॉग मात्र पळतोय. उनके दुश्मन है बहोत आदमी अच्छा होगा अर्थात हरेकृष्णाजी. हरेकृष्णाजी अजूनही सक्रीय आहेत त्याच उत्साहाने. प्राजक्ता पाटील, चकली, रुचिरा हे पाककलेवरचे ब्लॉग आजही आम्ही आवर्जून वाचतो. श्रीकृष्ण सामंत माझे गाववाले त्यामुळे आपुलकी असणारच. त्यांचा कृष्ण उवाच हा ब्लॉग मी अजूनही वाचतो. तुमचा अलीकडेच लिहिलेला "त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी" हा लेख मी वाचला. तुम्ही एका मिनिटात आम्हाला आमच्या गावी फिरवून आणता. आपला सिनेमास्कोप हा ब्लॉग माझ्या रिडींग लिस्ट मध्ये कायमच असतो. चित्रपटाचे नीटनेटके विश्लेषण वाचता येते आणि चित्रपट पहायचा की नाही हा निर्णय घेण सोप जात. नरेंद्र प्रभू यांचा ब्लॉगही २००८ ला सुरू झाला होता. प्रभू एक नियमित लेखक आहेत. मी नियमीत लेखक नसलो तरी वाचक मात्र आहे. 

असे अनेक ब्लॉग आहेत ज्यांनी २००७-०८ ला सुरुवात केलेली पण आता ते बंद पडले आहेत. मोरपीस ब्लॉग २००९ च्या एका वर्षाच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा सक्रीय झाला. संजय सोनावनी यांचा ब्लॉग एका वेगळ्या वाटेने जाणारा ब्लॉग. सामाजिक सुधारणा, समानता, इतिहास अशा अनेक विषयांबाबत त्यांचे लिखाण असते. मी आवर्जून वाचतो. ब्लॉग ने इंटरनेट वर एक क्रांती आणली होती. अभीव्यक्तीची क्रांती. केवळ कथा आणि कविता म्हणजे लेखन हा मराठीतला समज दूर करण्यासाठी एक काळ जावा लागला. सातत्याने मी याबद्दल लिहीत होतो. ब्लॉग या शब्दाचा अर्थ कळायला थोडे दिवस जावे लागले. वैयक्तिक ब्लॉग हा दैनंदिनी असू शकतो हे ज्यावेळी मी लिहीत होतो त्यावेळी टीकाही सहन करत होतो. भाषाशुद्धी वाले तर नेहमीच व्याकरणावर घसरायचे त्यांच्या दृष्टीने व्यक्त होताना सुद्धा व्याकरणाचे नियम तपासूनच लिहायचे असते. असो निंदकाचे घर असावे शेजारी असच काहीस म्हणतात. अर्थात माझे ब्लॉग लोकप्रिय करण्यात माझे वाचक आणि टीकाकार या दोघांचाही हातभार आहेच. त्यांचे खूप खूप आभार. ऑर्कुट आणि फेसबुकच्या लोकप्रियतेमुळे आज ब्लॉगची लोकप्रियता थोडी कमी झाली आहे पण अजूनही ब्लॉगर्स तेवढ्याच जोमाने आणि उत्साहाने लिहीत आहेत. काही तासात २०१२ सुरू होतय हे नवीन वर्ष ब्लॉगर्सना भरभराटीचे जावो हीच सदिच्छा ..  

२००८  सालात लिहिलेला लेखं जरूर वाचा...क्लिक करा...

लोकपाल लटकले

लोकपाल लटकले ...काल राज्यसभेत जी अभूतपूर्व परिस्थीती उद्भवली त्यामुळे लोकपाल अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल आहे. सरकारकडे राज्यसभेतही बहुमत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. विरोधक तर सोडाच साथीदारही हे बील पास करायला तयार नाहीत. तब्बल १८० संशोधने विरोधकांनी दिली. सपा, बसपा, जेडीयू, आर् जे डी हे पक्ष म्हणतात की लोकपाल फारच कठोर आणि मजबूत कायदा आहे आणि त्यामुळे आम्हाला फासाला लावण्याची तयारी सरकार करत आहे. एवढया सगळ्या संशोधनानंतर लोकपाल बिलात नक्की काय शिल्लक राहणार हाही एक मोठा प्रश्न होता त्यापेक्षा हे बील राज्यसभेत सुरक्षित राहील ते काही अंशी बर झालं. अन्यथा मतदान झालं असत तर सरकारी बील पडल असत पुन्हा हे बील मागे गेल असत आणि पुन्हा सात-आठ महिन्यांच्या दीर्घ प्रक्रियेनंतर लोकसभेत आल असत. आता आशा करुयात की पाच राज्याच्या निवडणुकीत थोड फार यश मिळाल तर कॉंग्रेसच राज्यसभेतल बळही वाढेल आणि लोकपाल बील पास होईल.

अर्थात आता पुढची लढाई ही कॉंग्रेस विरुद्ध भाजपा, अण्णा, सपा, बसपा, संघ अशी रंगणार आहे. अण्णांना तर पुन्हा एकदा संधी आहे कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्याची, रान उठवण्याची. दोन्ही पक्ष एकमेकांना दोष देतील. राजकीय मैदानात कोणी बाजी मारत हे त्या पक्षाची प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांच बळ आणि धूर्तपणा यावर अवलंबून राहील. अस असलं तरी हे बील पास करून घेण्यात आलेल अपयश ही सरकारसाठी नामुष्कीच आहे यात वाद नाही.

Thursday 29 December 2011

Happy New Year 2012

In Advance Happy New Year 2012 to all my friends...

Wednesday 28 December 2011

Really Funny Advt..must see


I Condemn killing of Indian student Anuj Bidve


I condemn killing of Indian student Anuj Bidve in England...really sad incident once again..

Bidve was shot in the head while walking from his hotel in Salford area towards the Manchester city center around 1.30 am. He died at a hospital a short while later.

काल लोकसभेत नक्की काय घडल?

काल लोकसभेत नक्की काय घडल? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. काल लोकसभेत सरकारने लोकपाल बील सदस्यांसमोर ठेवल. बील पास करण्यासाठी सरकारला साध्या बहुमताची गरज होती आणि ते सरकारजवळ होत त्यामुळे लोकपाल बील सहज पास झालं. पण लोकपाल मजबूत करण्यासाठी त्याला संविधानिक दर्जा देण्यासाठी जो प्रस्ताव मांडण्यात आला होता तो मात्र पडला. असा प्रस्ताव पास होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते आणि ते सरकारजवळ नाहीच आहे. जर विरोधकांनी साथ दिली असती तर हेही बील लिलया पास झालं असत आणि तशी चिन्हेही होती पण अस काय झालं आणि भाजपने युटर्न घेतलं? याचं उत्तर राजकारण हेच आहे आणि भाजपाही हे मान्य करत. आजपर्यंत भाजपने कधीही लोकपालला संविधानिक दर्जा देण्यास विरोध केला नव्हता. मग आताच विरोध का? त्याच कारण स्पष्ट आहे. जर हे बील पास झालं असत तर त्याचा सरळ फायदा कॉंग्रेसला झाला असता. राहुल गांधीना सगळ श्रेय गेल असत आणि पाच राज्यांच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना भाजपाला हे कधीही परवडणार नव्हत. म्हणनूच भाजपाने डाव रचत या बिलाचा पाडाव केला. 
 
प्रणव मुखर्जी यांनी निरोपाचे भाषण करताना हा डाव भाजपवरच उलटवण्याचा प्रयत्न केला. लोकपालल मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न होता पण भाजपाने तो यशस्वी होवू दिला नाही. लगेच सर्व कॉंग्रेस नेते एका सुरात भाजपावर टीका करू लागले. खर तर लोकसभेत पराजय होण नामुष्की असते पण ती नामुष्कीचाही कसा वापर करायला हे अनुभवी कॉंग्रेस नेत्यांना चांगलच माहिती आहे. उद्या राज्यसभेत हे बील मांडल जाईल आणि राज्यसभेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे. जर उद्या हे बील पडल तर पाच राज्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेस भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करेल यात शंकाच नाही. चित भी मेरी पट भी मेरी असाच काहीसा राजकीय धूर्तपणा आहे.

Sunday 25 December 2011

Merry ChristmasMerry Christmas

Merry Christmas to all my friends and relatives.

May ur neighbours respect you,
Trouble neglect u,
The angels protect u
and Heaven accept u
Happy Christmas and Happy Holiday..

Saturday 24 December 2011

अटलबिहारी वाजपेयी

लोकप्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उद्या जन्मदिन. गांधीच्या भारत छोडो आंदोलनात अटलजीनी तुरुंगवास भोगला. १९५७ मध्ये अटलजी सर्वप्रथम लोकसभेचे सदस्य बनले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी भविष्य वर्तवले होते की हा युवक एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनेल. हे भविष्य सत्यात उतरायला ३९ वर्षे लागली पण नेहरूंच्या नंतर सलग तीन वेळा पंतप्रधान बनण्याचा मान अटलजींनाच मिळाला. अटलजींच व्यक्तिमत्वच वेगळ होत. संकुचित दृष्टीकोन असलेल्या आपल्या पक्षाला त्यांनी विशाल दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी यांना दुर्गेचा अवतार म्हणून त्यांची पाठराखण करणारे अटलजी आणीबाणीत त्यांचा विरोध करताना सर्वात पुढे होते. आणीबाणीच्या वेळी आपल्या पक्षाचे विलीनीकरण त्यांनी जनता पार्टीत केले. पुढे ही जनता पार्टी काही टिकली नाही. 
 
१९८० मध्ये अटलजींनी भारतीय जनता पक्ष या नावाने पुन्हा एक नवी सुरुवात केली. पण १९८४ च्या निवणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले एके काळी ३० पेक्षा जास्त जागा जिंकणारा पक्ष दोन जागांवर आटोपला. अनेक चढउतार त्यांनी पाहिले. डीपॉझीट जप्त व्हायची पाळी आली पण ते खचले नाहीत. १९९६ च सरकार अल्पकालीन ठरल. २००४ पर्यंत अटलजी भारताचे पंतप्रधान राहिले. अटलजी उदारमतवादी होते. सर्वांना सोबत नेण्याची कला त्यांच्या कडे होती. आघाडी सरकारचा प्रयोग त्यांनीच यशस्वी करून दाखवला. विरोधकही अटलजींचा सन्मान करत परंतु त्यांच्या जवळच्या लोकांनीच त्यांना दगा दिला. सुब्रमण्यम स्वामी, शंकरसिंग वाघेला आणि काही इतर जवळच्या लोकांनीच अटलजींची साथ सोडली. याची खंत अटलजींनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केली. 
 
एकदा लोकसभेला संबोधीत करताना अटलजी म्हणाले होते की, "मी नेहरूंच्या काळातील लोकसभेचे सुवर्णयुग बघितले आहे. आजच्या नेत्यांचा बोलण्याचा स्तर घसरत चालला आहे." अटलजींनी कायम साफ भाषा ठेवली त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर कधीही घसरू दिला नाही. अटलजींच सक्षम नेतृत्व होत तोपर्यंत भाजपाचा सुवर्णकाळ होता. देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत बोलताना अटलबिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले आहे. अटलजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

भालजी पेंढारकर

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र महान मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. व्ही शांताराम त्यांचे मावसभाऊ होते. भालजींची आई राधाबाई आणि व्ही. शांताराम यांची आई कमलाबाई या सख्या बहिणी. मास्टर विनायक हे भालजींचे भाऊ. 

भालजींनी अनेक महान मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. त्यांचे छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, साधी माणस, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, महाराणी येसूबाई, वाल्मिकी, मीठ भाकर, सुनबाई हे चित्रपट खूप गाजले. ते मराठी चित्रपटांचे सुवर्णयुगच होते. मूक चित्रपटांपासून भालजींनी आपले करीयर सुरू केले. प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केले. कोल्हापूर चित्रपटसृष्टीतील इतर स्टुडियोतही त्यांनी काम केले. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. त्यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली त्यात छत्रपती शिवाजी, महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांचा समावेश आहे. 

१९८१ चा गनिमी कावा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९९१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Monday 19 December 2011

अवलिया धनुष...


गोवा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


गोवा मुक्ती दिनाच्या सर्व गोमंतकीयांना, माझ्या सर्व मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सीमावासीयांना विनम्र अभिवादन. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिक कारवार, वेंगुर्ला, बांदा, सावंतवाडी या भागात शरण घेत आणि रात्रीच्यावेळी पोर्तुगीज सैनिकांची नजर चुकवून सीमेवरून पलीकडे जात असत. १५ ऑगस्ट १९५५ ज्यावेळी सिंधुदुर्गात स्वातंत्र्यदिन साजरा होत होता शेजारचा गोवा मात्र पारतंत्रात होता. याचदिवशी ५००० लोकांनी सीमेवरील भागातून गोव्यात घुसून गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पलीकडून अंधाधुंद गोळीबार झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. शेकडोंनी जबर जखमी झाले. हा प्रयत्न गोव्याच्या लष्करी शक्तीमुळे अयशस्वी झाला. गोवा सरकारने अजून निर्दयता दाखवत सीमा सील केली. कोणालाही गोव्यात जावू दिल जात नव्हत. अनेकांचे नातेवाईक गोव्यात होते. माहेरवाशिणी दोन्हीकडच्या तिथेच अडकल्या. अनेकांच्या नोकऱ्या गोव्यात होत्या. सर्वकाही ठप्प झालं होत.

गोव्यातील परिस्थिती १९५५ नंतर चिघळत गेली. सशस्त्र आंदोलन सुरू झालं. आझाद गोमंतक दल आणि गोवा लिबरेशन आर्मी यात पुढे होती. अहिंसक आंदोलनेही सुरू होतीच. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच ऑगस्ट १९६१ मध्ये भारतीय फौजा सीमाभागात जमवाजमव करू लागल्या. पुढचे काही महिने सीमेवरील भागात भारतीय फौज तळ ठोकून होती आणि दबाव वाढवत होती. अखेर १7 डिसेंबरला सकाळी ९ वाजून ४५ मी. भारतीय भूदलाने दोन बाजूने म्हणजे सिंधुदुर्गातून आणि कर्नाटकातून हल्ला सुरू केला. ब्रिगेडीयर सगत सिंग यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग आणि डिचोली या लष्करी तळांवर हल्ले सुरू केले. ४५००० ची इन्फंट्री आणि चिलखती रणगाडे धूळ उडवत गोव्यात घुसले. पोर्तुगीजांनी घाबरून स्वतःच अस्नोडा आणि पेडणे येथिल पूल पाडले. १८ डिसेंबरला रात्री दोन वाजता दोडामार्ग ताब्यात घेत भारतीय फौजा उसगाव कडे कुच करू लागल्या. पहाटे चार वाजता डिचोली शहरावर ताब्यासाठी युद्ध सुरू झाले. आर्टिलरी ने जोरदार बॉम्बीग करत डिचोलीजवळील पोर्तुगीज तळावर ताबा मिळविला. तिकडे पहाटे ५ वाजेपर्यंत अस्नोडा ताब्यात आले.

सैन्याच्या विजयाच्या बातम्या येताच सीमाभागात आतिषबाजी सुरू झाली. मिठाई वाटली गेली. दुपारी १२ च्यादरम्यान म्हापसा शहराजवळ सैन्य पोहचले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भारतीय फौज पर्वरीत पोहचली होती. तिकडे नौदल आणि हवाईदलाच्या संयुक्त कारवाईत मडगाव बंदर ताब्यात घेण्यात आले. हवाई दलाने लढाऊ विमानांचा वापर करत बांबूळी विमानतळावर ६५००० पौंडाचा बॉम्ब वर्षाव केला आणि एका मिनिटात पूर्ण विमानतळ उध्वस्त केलं. एकाचवेळी एवढ्या मोठया हल्याला तोंड देण पोर्तुगीजांना जमल नाही अखेर १९ डिसेंबर म्हणजे अवघ्या दोन दिवसात पोर्तुगीज गोव्याचा पाडव झाला. पराजयाने चिडलेल्या पोर्तुगालने सजत सिंग यांना पकडून देणाऱ्यास युएस डॉलर १०००० च पारितोषिक जाहीर केलं. भारतीय हल्याच्या विरोधात पोर्तुगालमध्ये निदर्शने झाली. सिनेमागृहे आणि हॉटेल्स बंद करण्यात आली. नाताळ न साजरा करण्याचा निर्णय झाला. गोव्यात मात्र आनंदोत्सव सुरू होता. या युद्धात २२ भारतीय सैनिकांना वीरमरण आल आणि ५४ जखमी झाले. २० युद्धनौका आणि ४० लढाऊ विमांनांचा वापर भारतीय फौजेने केला. या लढयात वीरमरण आलेल्या सर्व जवानांना माझे वंदन.... गोय मुक्ती दिनाच्यो सगळ्या गोयकाराक शुभेच्छा...

Tuesday 13 December 2011

RIP Mario Miranda

RIP Mario Miranda


Sunday 11 December 2011

अवलिया

काल संध्याकाळी रुद्र हॉटेल मध्ये एका परदेशी व्यक्तीची भेट झाली. अगदी योगायोग. ती व्यक्ती हॉटेल मध्ये आली त्यावेळी मी रॉयल कॉकटेलवर ताव मारत होतो. त्याला वेटरने हिंदीत विचारले "क्या चाहिये? ". तो गडबडला दोन मिनिट दोघांनाही काही कळल नाही. मग त्याने मेनू कार्ड मागीतल तर त्यावर सगळ त्याला न कळण्यासारख. मग त्याने माझ्या कॉकटेल कडे बोट दाखवून Give me this सांगीतल. वेटर अगदीच नवीन पोरगा होता त्याला तेही नाही कळल. तसा तो व्यक्ती नमस्कार करत पुढे आला आणि माझ्याशी बोलू लागला. "hey i want that which is ur eating. is ther alcohol in this drink. i dont want alcohol" त्याची इंग्लीशही जेमतेम होती. मी वेटरला मराठीत कॉकटेल आणायला सांगीतल. मला कुतूहल वाटल त्या व्यक्ती बद्दल. आमच्या वेंगुर्ल्यात आणि गोव्यात येणारी बरीच परदेशी मंडळी alcohol मध्ये interested असतात आणि हे महाशय नको म्हणत होते. 
 
मी त्यांना विचारल तुम्ही कुठून आलात वगैरे. बोलण्यातून कळल की ते डॉक्टर थॉमस होते. स्वीडन मध्ये human psychology वर रिसर्च करत आहेत. त्यांना भारत खूप आवडतो. मगाशी घडलेल्या त्या प्रसंगाचा उल्लेख करून ते म्हणाले की मी स्वीडनचा माझी इंग्लीश जेमतेम कधीकधी मी गावांमध्ये जातो त्यावेळी केवळ खाणाखुणा करून मी लोकांशी संपर्क साधतो. हाच तर माझा व्यवसाय आहे लोकांना समजून घेणे त्यांच्याशी संपर्क साधणे. बोलता बोलता ते एक गोष्ट आवर्जून बोलले की मला भारतात आणि स्वीडनमध्ये खूप मोठा फरक जाणवतो. तो म्हणजे येथे लोकांना बोलायला वेळ आहे. हसायला वेळ आहे. लोकांची विचारपूस करण्याची वृत्ती आहे. स्वीडनमध्ये लोक बोलत नाहीत ओळख दाखवत नाहीत. मी हसत हसतच त्यांना म्हटल की ही संस्कृती आमच्याकडेही येते आहे. त्यावर ते म्हणाले अस होउ देवू नका. त्यांना भारतीय लोकशाही बद्दलही बरच आकर्षण आहे. ते म्हणाले की मला इथल्या लोकशाही आणि नोकरशाही बद्दल त्यांना अभ्यास करायचा आहे. फार कमी वेळात आम्ही बरच बोललो शेवटी मी त्यांना माझा फेसबुक id दिला. स्वीडन मध्ये फेसबुक एवढ लोकप्रिय आहे की जवळ जवळ ५० टक्के स्वीडीश नागरिक फेसबुक वापरतात. Definitely we will meet again म्हणत त्यांनी माझा निरोप घेतला. माणस जोडायच्या मोहिमेवर निघालेला हा अवलिया पुढच्या मुक्कमी रवाना झाला.

Saturday 22 October 2011

Happy Diwali

Happy Diwali To all my friends and supporters..


Wednesday 28 September 2011

मास्टर दिनानाथ मंगेशकर

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी निकराची झुंज देत संघर्षमय जीवन जगणारे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. गोव्यातील मंगेशी हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट तर आईचे नाव येसूबाईराणे होते. कै. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ओळख प्रसिद्ध संगीत नाट्यकलाकार, संगीतकार आणि गायक अशी आहे. संगीत नाटक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक संगीत नाटकांत काम केले.

वयाच्या  पाचव्या वर्षी दिनानाथांनी बाबा माशेलकर यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे संगीत शिकण्यास त्यांना वेळ लागला नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची शैली आत्मसात केली. दिनानाथांनी बिकानेरला जाऊन शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडीत सुखदेव प्रसाद यांच्याकडून घेतले. पंडीत सुखदेव प्रसाद हे पंडीत मणीप्रसाद यांचे वडील. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर दिनानाथ पुन्हा महाराष्ट्रात परतले. त्यांनी सावंतवाडीच्या रामकृष्णबुवा वझे यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. रामकृष्णबुवा वझे हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक होते. वझेबुवांनी केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, भालचंद पेंढारकर अशा दिग्गजांना संगीताचे शिक्षण दिले. 

वयाच्या १६ व्या वर्षी दिनानाथांनी किर्लोस्कर मंडळीत काम करायला सुरुवात केली. दिनानाथांनी किर्लोस्कर नाटक मंडळी आणि किर्लोस्कर संगीत मंडळी या मंडळातून सुरुवात केली. किर्लोस्कर संगीत मंडळी या संस्थेत अनेक लोकप्रिय संगीत नाटके त्यांनी केली. काही वर्षे किर्लोस्कर मंडळी सोबत काम केल्यानंतर दिनानाथांनी त्यांचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्या मदतीने बलवंत संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली. बलवंत नाट्यसंस्था उभी राहिली आणि दिनानाथ निर्माते झाले. अनेक लोकप्रिय संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केली. दिनानाथांनी एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडल्या. ते निर्मातेही होते, रचनाकारही होते, कलाकार होते आणि गायकही होते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. दिनानाथांनी रुद्रविणेच्या वापरास प्रोत्साहन दिले. त्यांच्या आग्रहामुळेच पंडीत कृष्णराव कोल्हापुरे रुद्रवीणा उस्ताद मुराद खान यांच्याकडून  शिकले. २५ नोव्हेंबर १९२२ ला दिनानाथांनी पणजीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात पोर्तुगीज गव्हर्नर जनरल उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमानंतर दीनानाथांचे कौतुक केले. त्यांना दोन सोन्याची पदके देऊन त्यांच गौरव केला. याप्रसंगी गव्हर्नर जनरल यांनी दिनानाथांना उद्देशून Filho de Goa (गोव्याचा सुपुत्र) असे गौरवोद्गार काढले.        

वयाच्या २२ व्या वर्षी १९२२ मध्ये दिनानाथ थाळनेर येथिल नर्मदा लाड यांच्याशी विवाहबद्ध झाले. दिनानाथांनी त्यांचे नाव श्रीमती असे ठेवले. त्यांना लतिका नावाची मुलगी होती पण तिचा मृत्यू झाला. नजीकच्या काळातच श्रीमती यांचाही मृत्यू झाला. १९२७ साली दिनानाथांनी द्वितीय लग्न अत्यंत साधेपणाने केले. द्वितीय पत्नीचे नाव त्यांनी शुद्धमती असे ठेवले. शुद्धमती ह्या माई म्हणून देखील ओळखल्या जायच्या.

१९३५ च्या दरम्यान दिनानाथ मंगेशकर यांच्या बलवंत पिक्चर्स या संस्थेने तीन चित्रपटांची निर्मिती केली. दिनानाथांनी आपल्या नाटकातून ब्रिटीश सत्तेला कायमच विरोध केला. त्यांनी वीर सावरकर लिखित संन्यस्त खड्ग हे नाटक रंगमंचावर सादर केलं. ब्रिटीश व्हाइसरॉय च्या समोर शिमल्यात त्यांनी सावरकरांच्या नाटकाचा प्रयोग केला. "रामराज्य वियोग" हे नाटक सोडले तर इतर नाटक पाच अक्षरी होती. दीनानाथांचा अंकशास्त्रावर विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांची नावे पंचाक्षरी असत असा समज होता. देशकंटक, पुण्यप्रभाव, मानापमान. सावरकरांचे नाटक सादर करून दिनानाथांनी ब्रिटीश सत्तेला उघड विरोधच केला होता. दिनानाथ मंगेशकर यांनी अनेक संगीत नाटके रंगमंचावर सादर केली. किर्लोस्कर आणि त्यांच्या संस्थेने विविध नाटके सादर केली ज्यात दिनानाथांनी काम केलं. यात खाडिलकरांनी लिहिलेले संगीत मानापमान, सावरकरांनी लिहिलेले सन्यस्त खड्ग, गडकरींनी लिहिलेले राजसंन्यास, वामनराव जोशी यांनी लिहिलेले रणदुंदुभी या नाटकांचा समावेश आहे. याखेरीज पुण्यप्रभाव, देशकंटक आणि रामराज्यवियोग या नाटकातही दिनानाथ मंगेशकरांनी काम केले.   

दिनानाथ मंगेशकर यांनी समाजाच्या विकासासाठी बरेच योगदान दिले. १९२६ साली जांबुवली येथे भरलेल्या "पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाज" या संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सभेस दिनानाथ उपस्थित होते. पणजी येथे मैफिल घेऊन दिनानाथ मंगेशकरांनी वसतीगृह उभारण्यासाठी शिक्षण फंडाला मदत केली.  दिनानाथांनी वेळोवेळी सर्वच समाजाला मदत केली. १८ डिसेंबर १९३७ रोजी प्रागतिक समाजाच्या मदतीसाठी दिनानाथ मंगेशकर यांनी कार्यक्रम केला यात दत्ताराम पर्वतकर, द्त्तीबाई नागेशकर, केशरबाई काळे यांनी भाग घेतला.  

दिनानाथांनी स्वत:ची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही समाजाला मदत केली. त्यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही जर विसरलो तर ती कृतघ्नता ठरेल. दिनानाथांनी कायम सामाजिक बांधिलकी जपली.  वयाच्या ४२ व्या वर्षी १९४२ मध्ये पुण्यात दिनानाथांची प्राणज्योत मावळली.

Reference : 
  1. Rudra Veena: an ancient string musical instrument By Hindraj Divekar, Robin D. Tribhuwan 
  2. Some immortals of Hindustani music - Susheela Misra 
  3. Profiles of eminent Goans, past and present By J. Clement Vaz

Monday 11 July 2011

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जेष्ठ समाजसेविका आणि बाबा आमटे यांच्या सहचारिणी साधनाताई आमटे यांच शुक्रवारी आनंदवन येथे निधन झाल. निधनासमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. आनंदवनातील बाबा आमटे यांच्या "श्रद्धावन" या समाधीस्थळावरच रविवारी साधनाताई यांना समाधी देण्यात आली. गेले काही महिने त्यांच्यावर उपचार चालू होते पण या उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्या कोमात गेल्या होत्या.
साधनाताई यांचा जन्म ५ मे १९२६ ला नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री घुले. पुढे बाबा आमटेंशी त्यांच लग्न झाल आणि त्या साधनाताई आमटे झाल्या. बाबा आमटेंच्या समाजसेवेत त्यांनीही स्वत:ला वाहून घेतलं. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारलं. त्यांनी आपले आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेत खर्च केलं. रुढी परंपरेच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला आणि कुष्ठरोग्यांना न्याय मिळवून दिला. साधनाताईंच "समिधा" हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. हे आत्मचरित्र मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. आपण ते जरूर वाचावे. साधनाताईंच्या जीवनापासून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. साधनाताई या सर्व समाजसेवकांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श आहेत. आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाप्रती आपली सामजिक बांधिलकी असते ह्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून जे काही शक्य असेल ते समाजासाठी करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यातील थोडा वेळ मानवी समाजाच्या हितासाठी बाजूला काढला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. 
   

Tuesday 5 July 2011

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का??

कमी वेळात प्रसिद्धी मिळवायची आहे का?? खून करा मग. कोणाचाही खून करा आणि कोणताही motive ठेवू नका. जेणेकरून तुम्ही लवकर सुटाल. थोडीफार शिक्षा होईल पण घाबरू नका खऱ्याच खोट करणारे वकील आहेतच ना? तूम्हाला थोडीफार सजा होईल पण बाहेर पडलात की फायदेच फायदे तुम्हाला काही अक्कल नसली तरी मिडीया तुम्हाला एवढी प्रसिद्धी देईल कि तुम्हालाच वाटू लागेल की तुम्ही नक्कीच काहीतरी देशभक्तीच चांगल काम केलय. तुम्ही कुठे शिकलात, तुमच बालपण कस गेल, तुम्ही कुठे नोकरी करायचा वगैरे वगैरे सर्व दाखवेल मिडीया. नंतर एखादी पत्रकार परिषद घ्या आणि त्यात न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा तुम्ही कसा केला नाही हे पण रडून रडून सांगा. मिडिया इतर महत्वाचे सर्व प्रश्न बाजूला ठेवून Live प्रक्षेपण करेल. त्यानंतर रामगोपाल वर्मा आहेतच. मला अभिनय येतो असे सांगितलात तर मुख्य भूमिका पण मिळेल. आणि एक तुम्ही ज्याचा खून केलाय तोच कसा वाईट होता हे सांगायला मात्र विसरू नका. भरपूर फायदे आहेत ना खुनाचे तुम्हाला काय वाटत???

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 

गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा - पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 

२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    

८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   


ShareThis

Registered With